१९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
गेल्या शतकाच्या पूर्वार्धात मार्क्सच्या विचारांनी प्रभावित झालेल्या कम्युनिस्टांनी चीन, सोव्हिएत युनियन, पूर्व युरोपातील व दक्षिण अमेरिकेतील अनेक छोट्या देशांत राजवटी प्रस्थापित केल्या; पण गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात कम्युनिस्ट विचारसरणीला व राजवटींना हादरे बसू लागले. याचे कारण अशा राजवटी चालवणाऱ्यांनी मार्क्सवादाचा पोथीवाद केला.
भारतात बंगाल व केरळ या राज्यांनी मार्क्सवादी राजवट तीन दशके टिकवली व राबवली; पण तिथेही मार्क्सवादी सत्ताभ्रष्ट झाले.
पत्रकार म्हणून बराच काळ कार्यरत असलेला कार्ल मार्क्स (जन्म : १८१८, मृत्यू : १८८३) १९व्या शतकातील अतिशय प्रभावशाली जर्मन तत्त्वज्ञ होता. त्याने अनेक विषयांवर लिखाण केले; पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण जास्त प्रसिद्ध आहे.
फ्रेडरिक एन्जेल्सप्रमाणे मार्क्सनेदेखील तत्कालीन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. मार्क्सने ‘दास कॅपिटाल’ या ग्रंथाचा पहिला खंड १८६७ मध्ये प्रसिद्ध केला. हा ग्रंथ म्हणजे साम्यवादी विचारप्रणालीची ‘गीता’ मानली जाते.
मार्क्सने पोथीवादाला विरोध करून, समाजकारणात सतत नवे प्रयोग होत राहिले पाहिजेत, असे प्रतिपादन केले; पण त्याच्या पुरस्कर्त्यांनी या विचाराचीही पोथी बनवली, हे दुर्दैव!
असा हा काळाच्या पुढे धावणारा विचारवंत!
- भारतकुमार राऊत